भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परमहंस श्री मुद्रल भारती महाराजांच्या ३२६ व्या संजीवन समाधी महोत्सवाला सुरुवात
अंबाडा (मोर्शी)दिनांक८ (काशिनाथ विश्वकर्मा)
मोर्शी येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र अंबाडा येथे परमहंस श्री मुद्रलभारती महाराज यांच्या ३२६ व्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त आयोजित भव्य श्रीराम कथेचा कालपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शुक्रवार दि. ७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झालेल्या या श्रीराम कथेचे आयोजन रविवार दि. १६ ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे.
या श्रीराम कथेचे कथावाचक परमपूज्य श्री श्यामनारायणदासजी महाराज चौबे (अमरावती) असून, त्यांच्या रसाळ वाणीतील प्रवचनाचा लाभ दररोज दुपारी १ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत भाविकांना मिळत आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून श्रीराम कथेचा आध्यात्मिक आनंद घेतला आहे.
संजीवन समाधी महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र अंबाडा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी काकड आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन व हरिकीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.
श्रीराम कथेदरम्यान श्रीराम कथेचा महिमा, श्री शंकर-पार्वती विवाह, प्रभू श्रीराम जन्म, श्रीराम-जानकी विवाह, वनवास, श्रीराम-भरत मिलाप, श्रीराम-हनुमान भेट, श्रीराम-रावण युद्ध आदी प्रसंगांचे भावपूर्ण विवेचन कथावाचक महाराजांच्या वाणीतून करण्यात येत आहे.
या महोत्सवातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी श्रीराम कथा ग्रंथ पूजा व परमहंस श्री मुद्रल भारती महाराज यांच्या चरणपादुकांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी अभिषेक, पूजा, गोपाळकाल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्रीक्षेत्र अंबाडा येथे सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्याचा लाभ परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री उत्सव समिती व संस्थान चे पदाधिकारीनि केले आहे.
0 Comments