व्यसनमुक्ती प्रबोधन प्रदर्शनीतून अंधश्रद्धेसोबत व्यसनमुक्तीचाही जागर; महा. अनिसच्या पंचसूत्रीची मांडणी
अमरावती, दि. १२ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती आणि गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राधानगर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट येथे “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत विचार” या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विचारप्रबोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिवर्तनाचा जागर करत हा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा मिशन ट्रस्ट, मुंबईचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख, नागरवाडी यांच्या दुःखद निधनाबद्दल उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. सामाजिक व सेवाभावी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश तराळ, ज्येष्ठ साहित्यिक तथा अध्यक्ष, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट आणि उपाध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती हे होते.
यावेळी डॉ. शोभा गायकवाड, प्राचार्य अनिल प्रांजळे, श्रीधरराव डहाके, कार्याध्यक्ष, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, डॉ. मंदा नांदुरकर, जिल्हाकार्यवाह, विवेकवाहिनी अमरावती, तसेच मा. रामदासजी सदार, कोषाध्यक्ष, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले विचार मांडले.
परिसंवादात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि अनिष्ट प्रथांविरोधात केलेले प्रबोधन, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा आजच्या काळातील संदर्भ यावर सखोल चर्चा झाली. तुकडोजी महाराजांचे साहित्य आणि विचार हे अंधश्रद्धामुक्त व विवेकनिष्ठ समाजनिर्मितीसाठी आजही दिशादर्शक असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
व्यसनमुक्ती प्रबोधन प्रदर्शनी ठरली आकर्षण
कार्यक्रमस्थळी व्यसनमुक्ती प्रबोधन प्रदर्शनी लावण्यात आली होती. या प्रदर्शनीच्या माध्यमातून व्यसनांचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलनासोबतच व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पंचसूत्रीचीही मांडणी करण्यात आली. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचार आणि सामाजिक परिवर्तनासाठी समितीच्या कार्याची दिशा उपस्थितांसमोर मांडण्यात आली.
वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ते व मान्यवरांचा सन्मान
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी शाल व अनिस अंक देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मा. श्री. पुरुषोत्तमराव गावंडे, अध्यक्ष, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, प्रतिभा खापरे, महिला राजसत्ता आंदोलन व ग्रामगीताचार्य, बबिता वानखडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती, डॉ. सिम्रेला देशमुख आणि सचिन वासनिक यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय डवरे यांनी केले. संचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीप लाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप हिवराले, आशिष देशमुख, दिगंबर मेश्राम, पल्लवी ढोले, विजया करोले, हेमंत उम्रटकर, मो. अफसर भाई, रेहमत शहा, व्यंकट खोब्रागडे यांच्यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, ग्राहक पंचायतचे अशोक हांडे, जयंत पिहूलकर, श्रीकृष्णराव कुलट, देविदासजी कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धामुक्त समाजनिर्मितीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ३७ वा वर्धापन दिन विशेष परिसंवादाच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
0 Comments