डाटा मायग्रेशन व पायलट बील प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 12 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : लेखा व कोषागारे संचालक कार्यालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जुनी सेवार्थ प्रणाली येत्या २० ऑगस्टला बंद करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी (डीडीओ) आपल्या कार्यालयाशी संबंधित आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
नवीन सेवार्थ प्रणालीच्या प्रभावी व सुरळीत
अंमलबजावणीसाठी संबंधित कार्यालयांची डाटा मायग्रेशन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व डीडीओंनी आपल्या कार्यालयाची डाटा मायग्रेशन प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करून घ्यावी. ही प्रक्रिया करताना कोणतीही तांत्रिक अडचण अथवा समस्या उद्भवल्यास त्या प्रलंबित न ठेवता कोषागार कार्यालयातील संबंधित तज्ज्ञांकडून तत्काळ मार्गदर्शन घेऊन सोडवून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
जुनी सेवार्थ प्रणाली बंद होण्यापूर्वी संबंधित कार्यालयांनी पायलट बील सादर करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये कामकाज सुरळीतपणे सुरू होण्यासाठी आवश्यक ती तयारी करून ठेवावी. २० ऑगस्ट २०२६ नंतर जुनी सेवार्थ प्रणाली उपलब्ध राहणार नसल्याने, आवश्यक असलेली कोणतीही कार्यवाही प्रलंबित राहणार नाही, याची सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. अंतिम मुदतीपूर्वी सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधितानी परस्पर समन्वयाने काम करावे. नवीन सेवार्थ प्रणालीच्या अंमलबजावणी दरम्यान कामकाजात कोणताही व्यत्यय येऊ नये आणि वेतनासह संबंधित आर्थिक कामकाज सुरळीतपणे पार पडावे, यासाठी सर्व संबंधितांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन, वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी केले आहे.
0 Comments