अमरावती, दि. २९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाने योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. चालू वर्ष 2025-26 साठीची ही ई-केवायसी मोहीम पूर्ण करण्यासाठी दि. 30 जून 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
विहित मुदतीत ई-केवायसी केली नसल्यास लाभार्थी शेतकरी आगामी हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतील. योजनेतील पारदर्शकता वाढवणे, गैरप्रकार व गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच योजनेचा पैसा पोहोचावा, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमॅट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. बायोमॅट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करण्यासाठी शेतकरी नजीकच्या सामायिक सुविधा केंद्रावर जाऊ शकतील. तसेच शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर 'पीएम-किसान’ मोबाईल ॲप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे ई-केवायसी पूर्ण करू शकतील.
वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना हालचालीसंबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा शेतकऱ्यांकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन 'फेस ऑथेंटिकेशन'द्वारे त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करतील.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कोणतीही अडचणी टाळण्यासाठी दि. 30 जून पूर्वी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन पीएम किसानचे जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
0 Comments