प्रलंबित खटले तडजोडीने मिटवण्याचे आवाहन
अमरावती, दि. ६: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार, शनिवार 12 सप्टेंबर 2026 रोजी अमरावती जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकअदालती’ चे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात दाखल असलेली आणि दाखलपूर्व (प्री- लिटीगेशन) प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहेत.
नि:शुल्क सेवा ; एकाच दिवशी अंतिम निकाल
या लोकअदालतीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पक्षकारांना यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. तसेच, यामध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांचा अंतिम निकाल त्याच दिवशी लावण्यात येणार आहे. यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.
नागरिकांनी आपले तडजोडपात्र प्रलंबित खटले ‘राष्ट्रीय लोकअदालती’मध्ये ठेवून सामंजस्याने मिटवण्यासाठी संबंधित न्यायालयात त्वरित अर्ज करण्याचे आवाहन, अमरावती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला एम. नंदेश्वर आणि सचिव संजय ता. सहारे यांनी केले आहे. तसेच, दाखलपूर्व प्रकरणांबाबत नागरिकांनी आपल्या नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालयाशी संपर्क साधावा आणि 12 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित होणाऱ्या 'राष्ट्रीय लोकअदालती'चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 Comments