उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना श्रध्दांजली
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाने मराठी साहित्यसृष्टीचे मोठे नुकसान
वऱ्हाडी भाषेला देशव्यापी ओळख देणारा कवी हरपला
मुंबई दि.२९:- विदर्भातील ख्यातनाम कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाने महाराष्ट्रातील हास्यव्यंग कवी संमेलनातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, हसता हसता लोटपोट करणे आणि त्यातून समाजप्रबोधन करणे हे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे खरे हास्य कसब होते. त्यांचा 'जांगडबुत्ता ' हा शब्द कोणत्याही विनोदाला गोळीबंद स्वरूपात वापरण्यासाठी सगळ्याच व्यासपीठावर वापरला जात होता. सामाजिक एकोपा आणि सामाजिक विषयांवर त्यांची नेमकी टिपणी समाजाला अंतर्मुख करायची.
वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी हास्यमैफिलीतून निरोप घेतला. त्यांच्यासारख्या वैविध्यपूर्ण मांडणी करणाऱ्या साहित्यिकामुळे राज्याची कवितेच्या प्रांतात वेगळी ओळख निर्माण झाली होती. जवळपास 20 कवितासंग्रह त्यांच्या काव्यप्रतिभेची साक्ष देतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे चाहते आहेत. हल्लीच्या तणावाच्या वातावरणात सर्वसामान्यांना हलक्याफुलक्या मराठी साहित्यातून प्रफुल्लित करण्याचे कसब त्यांच्या काव्यरचनेत होते. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
Post a Comment
0 Comments