अमरावती, दि. 18 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): समाजातील आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत करणाऱ्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर यांसारख्या कमी उत्पन्न असलेल्या श्रेणीतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी किंवा पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी परदेशात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी ही योजना राविण्यात येते आहे.
अर्जदार हा अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती किंवा भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर या घटकातील असावा. विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा. निवड वर्षासाठी एप्रिलच्या पहिल्या दिवशी वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे. पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे.
परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत ५०० च्या आत असावी. या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम, निर्वाह भत्यामध्ये अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी १५,४०० डॉलर वार्षिक, यू. के. साठी ९,९०० पाऊंड वार्षिक, तसेच आकस्मिक खर्च म्हणून पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चासाठी अमेरिका व इतर देशांसाठी १,५०० डॉलर, यू. के. साठी १,१०० पाऊंड देण्यात येतात. विद्यार्थ्यांना आरोग्य विमा आणि व्हिसा शुल्क अनुज्ञेय असणार आहे. परदेशात जाताना आणि अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना प्रवासाचा खर्च देण्यात येतो.
या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी nosmsje.gov.in या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना आणि अधिक माहिती मिळवावी. योजने संबंधित अधिक माहितीसाठी योगेश तनेजा, अवर सचिव, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली-११०००१. फोनः ०११-२३३८४०२३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments