अमरावती, दि. 30 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : अमरावती शहर संजय गांधी कार्यालयाच्या वतीने संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, शासन निर्देशानुसार, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मागील महिन्यात तांत्रिक कारणामुळे अनुदान जमा होऊ शकले नाही, अशा लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे. ही पडताळणी पूर्ण केल्याशिवाय त्यांना वाढीव अनुदान मिळणार नाही. त्यामुळे, संबंधित लाभार्थ्यांनी त्यांची मूळ कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि यूडीआयडी कार्ड घेऊन शहर संजय गांधी कार्यालय, अमरावती येथे तात्काळ संपर्क साधावा. ज्या लाभार्थ्यांनी आपल्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेतली नाही, त्यांना पुढील महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळणार नाही आणि अनुदानात खंड पडल्यास त्यासाठी लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील, याची गंभीर नोंद घ्यावी. लाभार्थ्यांनी त्वरित कार्यवाही करून आपले अनुदान सुनिश्चित करावे, असे आवाहन शहर संजय गांधी कार्यालयाच्या तहसिलदारांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments