अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आदेशानुसार खरीप -२०२५ हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी युरिया आणि डीएपी रासायनिक खतांचा संरक्षित साठा खुला करण्यात आला आहे. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा आणि धारणी या भागातील युरिया आणि डीएपी खताच्या मागणी संदर्भात नुकतीच बैठक घेतली होती. त्यांच्या पुढाकाराने युरिया आणि डीएपीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खरीप हंगामासाठी युरियाचा साठा संरक्षित ठेवण्यासाठी 'दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूर' आणि 'महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित' यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये १८६०.६०५ मेट्रिक टन युरिया आणि ८०८.४५ मेट्रिक टन डीएपीचा साठा या संस्थांमार्फत संरक्षित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर ९ जुलै २०२५ रोजी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा मुक्त करण्यास मान्यता दिली आहे.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील तालुकानिहाय युरियाचा साठा खालीलप्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे: अचलपूर: 70.00 मेट्रिक टन , दर्यापूर: 120.00 मेट्रिक टन, चांदूर बाजार: 50.00 मेट्रिक टन , अमरावती: 40.00 मेट्रिक टन, चिखलदरा: 100.00 मेट्रिक ट, भातकुली: 40.00मेट्रिक टन , नांदगाव खंडेश्वर: 40.00 मेट्रिक टन, अंजनगाव सुजी: 100.00 मेट्रिक टन, धारणी: 140.00 मेट्रिक टन, तिवसा: 40.00 मेट्रिक टन, चांदूर रेल्वे: 30.00 मेट्रिक टन, मोर्शी: 80.00 मेट्रिक टन , वरुड: 80.00 मेट्रिक टन. जिल्ह्यात एकूण 930.00 मेट्रिक टन युरियाचा साठा आता विक्रीसाठी उपलब्ध होईल.
मुक्त करण्यात आलेला हा रासायनिक खतांचा साठा तातडीने शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देश कृषी विकास अधिकारी एम. जे. ताडकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिले आहेत.
Post a Comment
0 Comments