अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम सन २०२५ साठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत १८ हजार ५०३ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे. कृषी विभागाने सर्व शेतकरी बांधवांना पिकांचा विमा काढून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, गावातील सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका स्तरावरील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. जर अर्ज करण्यासाठी निर्धारित प्रीमियमपेक्षा जास्त पैसे मागितले जात असतील, तर शेतकऱ्यांनी कृषी विभाग किंवा तहसील कार्यालयात तक्रार करावी.
अंतिम दिवसांमध्ये पीक विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, शक्य तितक्या लवकर जवळच्या सी.एस.सी केंद्राशी संपर्क साधून या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
0 Comments