अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): 'कार्यक्षमतेला दिशा -जागतिक युवा कौशल्य दिन' या दिनाचे औचित्य साधून अमरावती येथे नुकतेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सिकची रिसॉर्ट, वलगाव येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉवेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कार्यानुसार निवड झालेल्या ६ उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी श्री. बोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित उद्योजकांचा विभागाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती कार्यालयातील कर्मचारी वैष्णवी कुयरे, सोनाली भोगे, श्री अनिता नांदुरकर, अंकुश सातपैसे, प्रथमेश सोहळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
याव्यतिरिक्त, शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय हिरक महोत्सवामधील एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवात विविध उपक्रमांसह सहभागी झालेल्या अमरावती जिल्ह्यातील ५ संस्थांना (इमेज कॉम्प्युटर इन्स्टिट्युट, रोशनी महिला विकास संस्था, स्पार्क कॉम्प्युटर इन्स्टिट्युट, करिअर कॉम्प्युटर इन्स्टिट्युट, डाखरे महाराज फाऊंडेशन) प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातून उपायुक्त दत्तात्रय वाकरे यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना, नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे बनण्याचा संदेश दिला.
प्रेमकिशोर सिकची रिसॉर्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त प्रिती सोमाणी यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आयोजक सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी मिळाव्यात, या हेतूने या मेळाव्याचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.
सिकची रिसॉर्टचे संचालक सचिन मालकर, गजानन कडू, मनीषा निर्मल आणि कौशल्य विकास विभागाचे मार्गदर्शन अधिकारी अभिषेक ठाकरे यावेळी उपस्थित होते. रोजगार मेळाव्यात वैभव एंटरप्रायझेस, पीपल ट्री वेंचर, जाधव गियर, स्पंदन मायक्रो फायनान्स, एलआयसी इंडिया, स्वीगी यासह एकूण १५ कंपन्यांनी सहभाग घेऊन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैष्णवी कुवरे यांनी तर आभार क्रपा अरगुल्लेवार यांनी मानले.
.jpeg)
Post a Comment
0 Comments