अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): भारतीय डाक विभागाने आपल्या सेवांमध्ये मोठे बदल घडवून आणण्यासाठी 'आयटी २.० (IT २.०)' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत 'ए.पी.टी. ॲप्लिकेशन (APT Application)' ही नवीन डिजिटल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत.
या नव्या प्रणालीची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट ऑफिसमधून सुरू होणार असून, २२ जुलै २०२५ पासून अमरावती प्रधान डाकघराच्या अखत्यारितील अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी आणि वरुड या तालुक्यातील सर्व टपाल शाखा डाकघर कार्यालये व उपडाकघर कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित होईल.
या महत्त्वपूर्ण बदलासाठी आवश्यक असलेल्या डेटा स्थलांतरणाची प्रक्रिया २१ जुलै २०२५ रोजी नियोजित करण्यात आली आहे. या तांत्रिक कामामुळे, सोमवार, काल दि. २१ जुलै २०२५ रोजी वरील सर्व तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत, अशी माहिती अमरावती पोस्ट विभागाचे प्रवर अधिक्षक डाकघर यांनी दिली आहे.
भारतीय डाक विभागाने आपल्या सर्व ग्राहकांना विनंती केली आहे की, त्यांनी त्यांची सर्व महत्त्वाची पोस्टातील कामे २१ जुलै २०२५ पूर्वीच पूर्ण करून घ्यावीत. या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल डाक विभागाने खेद व्यक्त केला आहे. प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या, जलद आणि डिजिटली सक्षम सेवा देण्यासाठीच ही पावले उचलली जात असल्याची ग्वाही डाक विभागाने दिली आहे.
Post a Comment
0 Comments