अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) तिवसा तालुक्यात सुरू असलेल्या विहिरींच्या कामांना गती देण्यासाठी पंचायत समितीने महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. तालुक्यात एकूण ५८४ विहिरींची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंर्तगत वैयक्तिक सिंचन विहीर ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. यात विहीरी खोदुन व बांधुन पूर्ण करणे ही वैयक्तिक लाभार्थ्यांची जबाबदारी आहे. विहीरीच्या बांधकामासाठी प्राप्त होणारा कुशल, अर्धकुशल निधी हा विहिरीचे भौतिकदृष्ट्या काम पुर्ण झाल्यावरच तांत्रिक अधिकाऱ्यामार्फत मोजमाप करुन व शासनाला मागणी सादर केल्यानुसार प्राप्त होत असतो.
मात्र कुंपन घातलेला नाही आणि बांधकाम अपूर्ण असलेल्या विहीरी शेतकरी व जनावरांसाठी धोकादायक ठरत आहे. अशा विहीरीमुळे जावरा शिवारात घडलेल्या दुर्घटनेमुळे विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर अपुर्ण विहीरीचे काम पुर्ण करणे कठीण आहे. मात्र सर्व लाभार्थी आणि शेतकऱ्यांनी शेतातील विहीरीचे काम अपूर्ण असल्यास खबरदारीने उपाय म्हणून सदर जागी तातडीने संरक्षण कुंपण लावुन घ्यावे. तसेच शक्य तितक्या लवकर बांधकाम पूर्ण करावे. याबाब पॅनल तांत्रिक अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांनी अपूर्ण विहीरींना प्रत्यक्ष भेट देवून लाभार्थ्यांना अवगत करून कोणतीही दुर्घटना घडणार नाही यांची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंचायत समिती तिवसा अंतर्गत मनरेगामध्ये खोदलेल्या व बांधकाम पूर्ण केलेल्या विहिरींच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहिरींची कामे अपूर्ण असलेल्या ठिकाणी तातडीने पाहणी करून ती पूर्ण करण्याची जबाबदारी तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि रोजगार सेवक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांनी विहिरींना प्रत्यक्ष भेट देऊन कामाची सद्यस्थिती तपासण्यास व उर्वरित कामे त्वरीत पूर्ण करावे, असे आवाहन तिवसाचे गटविकास अधिकारी यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments