अमरावती, दि.१३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या ‘अमृत संवाद सेतु’ उपक्रमांतर्गत महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तहसील कार्यालय, अमरावती येथे भेट देऊन प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती जाणून घेतली.
या अभ्यास भेटी दरम्यान नायब तहसीलदार अशोक कालीवकर यांनी विद्यार्थिनींना तहसील कार्यालयातील विविध विभागांचे कार्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा तसेच विविध प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, महिला आरक्षण प्रमाणपत्र यांसह विविध शासकीय दाखले व कागदपत्रांची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली.
शासकीय कार्यालयाची कार्यपद्धती,नागरिकांनी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे, शासकीय योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच प्रशासनाशी प्रभावी संवाद याबाबत विद्यार्थिनींनी प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. श्री. कालीवकर यांनी ‘अमृत संवाद सेतु’ उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थिनींनी प्रशासन समजून घेण्याबरोबरच जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका ओळखावी, असे आवाहन केले. कार्यक्रमास अमृतचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश कथलकर तसेच महिला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. शर्मिला देशमुख, प्रा. डॉ. गोपाल घुमटकर यांची उपस्थिती होती.
‘अमृत संवाद सेतु’च्या माध्यमातून विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यातील संवादाची दरी कमी करून प्रशासनाची समज, नागरिकत्वाची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तहसील अमरावतीला दिलेली ही भेट विद्यार्थिनींसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली.
0 Comments