Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्ह्यात बालविवाहाविरुद्ध मोठी कारवाई; प्रशासकीय सतर्कतेमुळे एकाच महिन्यात 6 विवाह रोखले



अमरावती, दि.१ मे (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला एप्रिल महिन्यात उल्लेखनीय यश मिळाले असून विविध यंत्रणांच्या समन्वयातून एकूण 6 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच महिला व बाल विकास विभाग, पोलीस प्रशासन, बाल संरक्षण यंत्रणा व बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त पथकांनी तात्काळ हस्तक्षेप करून हे विवाह थांबविले. संबंधित पालक व कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच कायदेशीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कारवाईमुळे संबंधित बालकांचे शिक्षण, आरोग्य व सुरक्षित भविष्य जपण्यात मदत झाली असून, समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बालविवाह करणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे प्रशासनाने पुन्हा अधोरेखित केले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित 1098 चाईल्ड हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. बालविवाहमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments