*20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. ३१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि ज्या संस्थांमध्ये ५१ टक्केपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त किंवा सदस्य आहेत, अशा संस्थांसाठी राज्य शासनाकडून मदत दिली जाणार आहे. बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयीसुविधांसाठी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत पात्र संस्थांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागवले आहेत. इच्छुक संस्थांनी प्रस्ताव २० फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे लागणार आहे. यासाठी संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे आणि नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत असणे आवश्यक आहे. संस्थेच्या विश्वस्त किंवा सदस्यांमध्ये बौद्ध समाजाचे प्रमाण ५१ टक्केपेक्षा जास्त असावे. या योजनेचा लाभ एका संस्थेला पाच वेळाच घेता येणार आहे.
या योजनेंतर्गत प्रामुख्याने स्वतःची इमारत असल्यास इमारतीचे किरकोळ नूतनीकरण व डागडुजी, शुद्ध पेयजल व्यवस्था, प्रसाधनगृह आणि स्वच्छतागृह उभारणी, ग्रंथालय, अभ्यासिका, संगणक कक्ष किंवा रिसर्च सेंटर अद्ययावत करणे, विपश्यना केंद्र किंवा प्रशिक्षण केंद्राचे नूतनीकरण, फर्निचर, जनरेटर, इन्व्हर्टर, सोलर सुविधा आणि सुरक्षा कॅमेरे बसवणे, कार्यशाळा किंवा सभागृहाचे बांधकाम व सुशोभीकरण या सुविधांसाठी निधी दिला जाणार आहे.
इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, अल्पसंख्याक कक्ष, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, अमरावती येथे दोन प्रतीत सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Post a Comment
0 Comments