अमरावती, दि. २८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : नांदगाव पेठ येथील रतन इंडियाच्या प्रकल्पामुळे शेतपिकाचे नुकसान होत असल्याची तक्रारी येत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी यानंतर आता दर महिन्यात शेतपिकांची पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात काल रतन इंडिया पॉवर लिमीटेडमधील विविध प्रश्नांवर काल बैठक पार पडली. यावेळी आमदार राजेश वानखेडे, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले यांच्यासह कंपनी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, वीज प्रकल्पामुळे परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी कृषी विभागातर्फे दर महिन्यात पाहणी करण्यात येईल. सध्या कृषी विभागाने शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान नोंदविले आहे, त्याची भरपाई देण्यात येईल. यात कोणतीही कपात करू दिली जाणार नाही. यासोबतच 16 जणांच्या अनुकंपा तत्वावरील नोकरीचा प्रश्नही विचार करण्यात यावा. यासाठी व्यवस्थापनासोबतच चर्चा करावी. वाघोली गावात राखेची धुळ येत असल्यामुळे यावर उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच गावाच्या स्थलांतरणाबाबत विचार करण्यात येईल.
प्रकल्पामध्ये विविध करणांनी आंदोलने होतात. ही आंदोलने शांततेच्या मार्गाने करण्यात यावी. तसेच काही समस्या निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. राखेच्या वाहतुकीमध्ये पारदर्शकता आणावी. वजन मोजण्यासाठी वे ब्रिजची व्यवस्था करण्यात यावी. प्रकल्पाशी संबंधीत व्यक्तींना त्रास होणार नाही, याची प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
Post a Comment
0 Comments