अमरावती, दि. २८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावा, यासाठी कॅशलेस सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील अपघाताचे ठिकाण शोधून त्याठिकाणचे रूग्णालय यात अंगीकृत करावे, तसेच रस्ते अपघातात तातडीने मदत पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज रस्ते सुरक्षा समितीची सभा पार पडली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, अपघात रोखण्यासाठी गतीरोधक बसविताना शास्त्रोक्त पद्धतीने बसविण्यात यावी. यामुळे वाहनांचे संतुलन बिघडून अपघात घडू नये, याची काळजी घ्यावी. गती कमी करण्यासाठी स्ट्रीप्स बसविण्यात येतात. यामुळे वाहनांवरील नियंत्रण होत नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे गतीरोधकाची कामे करताना तांत्रिक बाबी तपासून कामे करण्यात यावी. यासोबतच अपघाताची ठिकाणे शोधून त्याठिकाणी उपाययोजना करण्यात यावी.
राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गाला पोहोच असणाऱ्या रस्त्यांवर गतीरोधक बसविण्यात यावे. त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या वाहनांची गती कमी होण्यास मदत मिळेल. तसेच बसेस थांबविण्यासाठी योग्य जागा शोधून त्याठिकाणी थांबविण्यात याव्यात. मोर्शी येथे रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडचण होत असल्याने ही अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत. शिंगणापूर येथील हायमास्टचे काम तातडीने करण्यात यावे. तसेच अपघाताची माहिती पोर्टलवर तातडीने भरण्यात यावी. रस्ता सुरक्षा अभियाना नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केली.
Post a Comment
0 Comments