साहित्य आणि प्रशासन क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती ;
कौटिल्याचे विचार आजही सुसंगत असल्याचे प्रतिपादन
अमरावती, दि.२८ : येथील बडनेरा रोडवरील श्री हरिचंद्र हॉटेलमध्ये शनिवार, 24 जानेवारी रोजी डॉ. कीर्ती राम पिंजरकर लिखित आणि पद्यगंधा प्रकाशन, पुणे द्वारे प्रकाशित 'कौटिल्यप्रणीत सुशासन आणि प्रशासन तंत्र' या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या मांदियाळीत पार पडला. इ.स. पूर्व चवथ्या शतकात कौटिल्याने मांडलेले नैतिकता व सचोटीचे विचार आजही सुसंगत असल्याचे प्रतिपादन उद्घाटक तथा माजी पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय होते. विशेष अतिथी म्हणून रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावंकर, लेडी गर्व्हनर डॉ. कमलताई गवई उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून संस्कृत व भारतीय इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. हेमंत राजोपाध्ये यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर पद्यगंधा प्रकाशनचे अभिषेक जाखडे आणि सिद्धार्थ प्रकाशनचे शिवाजी धुरी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कौटिल्य : केवळ इतिहास नव्हे, तर भविष्याचा मार्ग
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या भाषणात कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला. डॉ. कीर्ती पिंजरकर यांनी कौटिल्याच्या विचारांना आधुनिक संदर्भात मांडून प्रशासनासमोर एक नवा आदर्श ठेवला असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते प्रा. हेमंत राजोपाध्ये यांनी ग्रंथाचे विश्लेषण करताना सांगितले की, "कौटिल्याने केवळ राज्यव्यवस्थाच मांडली नाही, तर 'बहुजनहिताय बहुजनसुखाय' या सूत्रावर आधारित समाजव्यवस्था निर्माण केली. या पुस्तकात भ्रष्टाचाराचे 40 प्रकार, आपत्ती व्यवस्थापन आणि अगदी तृतीयपंथीयांचा प्रशासनातील सहभाग यांसारख्या आधुनिकोत्तर विषयांवर केलेले विवेचन लेखिकेच्या सखोल अभ्यासाची पावती देते."
ग्रंथाचे वेगळेपण
या ग्रंथात कौटिल्यकालीन प्रशासनातील अनेक धाडसी आणि प्रगत विषयांचा समावेश करण्यात आला आहे, जसे की:
प्रशासन यंत्रणा: सनदी नोकरवर्गाची भरती, पदोन्नती, बदली आणि निवृत्तीवेतनाचे नियम.
सामाजिक अधिकार: स्त्रियांचे आर्थिक अधिकार, गर्भपात, स्वेच्छामृत्यू आणि समलिंगी संबंधांबाबतचे तत्कालीन कायदे.
आर्थिक शिस्त: भ्रष्टाचार निर्मूलन, कर प्रणाली आणि बनावट चलनावर नियंत्रण.
लोककल्याण: आपत्ती व्यवस्थापन आणि शेती विकासासाठी राज्यकर्त्याची कर्तव्ये.
लेखिकेचा परिचय
लेखिका डॉ. कीर्ती पिंजरकर या संस्कृत भाषेतील पीएचडीधारक असून त्या शहरातील आदर्श प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या अभ्यासपूर्ण ग्रंथामुळे संस्कृत साहित्यातील संशोधनाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाला शहरातील शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "प्रशासनातील पारदर्शकता आणि राजधर्माची व्याप्ती समजून घेण्यासाठी हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायला हवा," असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
Post a Comment
0 Comments