अमरावती, दि. 0१ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : सेवा पंधरवड्यानिमित्त महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियानातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात अमरावती तहसिल कार्यालयातर्फे भटके, विमुक्त जातीच्या नागरिकांना विविध लाभाचे वाटप करण्यात आले.
तहसिल कार्यालयातील कार्यक्रमाला आमदार रवि राणा, राजेश वानखडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
श्री. राणा यांनी या उपक्रमामुळे नागरिकांना तातडीने सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. घरकुल, पट्टेवाटप यामुळे समाजातील शेवटच्या घटकांना न्याय मिळणार आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे वंचित घटकांना आधार मिळेल. गावठाणातील घरांसाठी गावाची हद्द वाढविण्याची सूचना आली आहे. त्यामुळे वाढीव गावाला मान्यता मिळणार आहे. येत्या काळात राज्यात सर्वाधिक पट्टे वाटप अमरावतीमध्ये व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. वानखडे यांनी वंचित घटकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. प्रत्येकाला घर मिळाल्यास कुटुंबाची स्थायी व्यवस्था होणार आहे. एका ठिकाणी भटक्या, विमुक्त जाती स्थायी झाल्यास त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
श्री. भटकर यांनी प्रास्ताविक केले. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पट्टेवाटप, कृषि निविष्ठा, तसेच विविध प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
Post a Comment
0 Comments