6 मार्चला विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन
अमरावती, दि. ५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्यात बांधकाम क्षेत्रासाठी नैसर्गिक वाळूचा तुटवडा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने 'कृत्रिम वाळू' धोरण निश्चित केले आहे. या धोरणाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि नवीन युनिट स्थापन करू इच्छिणाऱ्या उद्योजकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी दिनांक 6 मार्च 2026 रोजी महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी 12.30 वाजता जिल्हा खनिकर्म विभागामार्फत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय धोरणानुसार, कृत्रिम वाळू युनिट स्थापन करण्यासाठी सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मात्र, हे युनिट स्थापन करण्याची कार्यपद्धती, अर्जाचा नमुना आणि तांत्रिक बाबींबाबत अनेक इच्छुकांच्या मनात शंका दूर करण्यासाठी या मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांनी सांगितले की, कृत्रिम वाळू निर्मितीला चालना देण्यासाठी शासन स्तरावर विविध सवलती आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत युनिट स्थापन करण्याबाबतच्या अडचणींवर चर्चा केली जाईल तसेच नवीन अर्जांबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. तरी ज्यांना कृत्रिम वाळू युनिट सुरू करण्यात रस आहे किंवा ज्यांच्या अर्जाबाबत काही शंका आहेत, अशा संबंधितांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन खनिकर्म विभागाकडून करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments