Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा होणार – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर



मुंबई, दि. ३१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :

    . राज्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या अवयवदान पंधरवड्याचे नियोजन प्रभावी व उद्दिष्टपूर्ण असावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयात अवयवदान पंधरवड्याच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. शुक्ला यांच्यासह दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे राज्यातील विभागीय अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, अनेक रुग्ण आजही अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ठराविक उद्दिष्ट ठेवून, गतीने आणि जनजागृतीवर भर देत काम करणे आवश्यक आहे. १५ ऑगस्ट रोजी अवयवदान करणारे तसेच लाभार्थी रुग्ण यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात यावा, त्यांना प्रशस्तिपत्र देण्यात यावे आणि माध्यमांसमोर त्यांची मते मांडण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण, कार्यशाळा, नियोजनपूर्व सूचना यांच्या माध्यमातून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात यावे. आजपर्यंत प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना अवयव मिळवून देण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू ठेवावेत. अवयव दात्यांचा विश्वास मिळवून सकारात्मक वातावरण निर्माण करावे आणि काम गतिमान, परिणामकारक असावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, अवयवदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून अधिकाधिक रुग्णांना अवयव मिळावेत, यासाठी पंधरवड्यात प्रभावी कामकाज व्हावे, असे त्यांनी सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments