मेळाव्यात 38 उमेदवारांना मिळाली संधी
अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एच. आर. देशमुख आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही तर खचून जाऊ नका, उलट नव्या जिद्दीने पुन्हा सुरुवात करण्याचा संदेश दिला. डॉ. कोळी यांनी तरुणांना केवळ नोकरी मिळवणारे न होता, नोकरी देणारे (उद्योजक) बनण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी होती. प्रास्ताविक करताना डॉ. राजीव बोरकर यांनी सांगितले की, टीसीएस मध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते, जे पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. या मेळाव्यात 200 रिक्त पदांसाठी एकूण 288 उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. निवड प्रक्रियेअंती 112 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 38 उमेदवारांना अंतिम निवडीचे पत्र देण्यात आले. सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments