11 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत नोंदणीकृत संस्था आणि बचतगटांना संधी
अमरावती, दि.२६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील सावंगा आसरा येथे नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठीचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार, या दुकानाचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहणार आहे. या प्रक्रियेत वैयक्तिक अर्जांचा विचार केला जाणार नसून, केवळ नोंदणीकृत संस्था आणि बचत गटांनाच संधी मिळणार आहे.
या जाहीरनाम्यानुसार, ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमअंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था आणि सार्वजनिक संस्था किंवा ट्रस्ट यांचेकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र अर्जांची निवड करताना बचतगटांच्या बाबतीत त्यांचे आर्थिक व्यवहार, पारदर्शकता आणि किमान 80 टक्के कर्ज परतफेडीचे प्रमाण विचारात घेतले जाईल. विशेष म्हणजे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती अंतिम निर्णयापूर्वी हा प्रस्ताव संबंधित 'महिला ग्रामसभे'कडे शिफारशीसाठी पाठवणार आहे.
इच्छुक संस्थांना रास्त भाव दुकानाचे अर्ज 100 रुपयांच्या चलनाद्वारे अमरावती तहसील कार्यालयातून प्राप्त करून घेता येतील. अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया 11 एप्रिल 2026 पर्यंत आहे. कार्यालयीन वेळेत हे अर्ज स्वीकारले जातील. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालय बंद राहील. अर्जासोबत मागील तीन वर्षांचे ऑडिट रिपोर्ट (2023 ते 2026), बँक पासबुक, जागेचा 7/12 किंवा भाडेकरार आणि सर्व सदस्यांचे एकत्रित प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments