Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

सन 2025 च्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत

अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शेती आणि पूरक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध कृषी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन 2025 सालाकरिता या पुरस्कारांसाठी पात्र शेतकरी, महिला, संस्था आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींकडून ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली आहे.

या पुरस्कारांमध्ये प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण (महिलांसाठी), वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडित, आणि युवा शेतकरी पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण आणि विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. हे सर्व सन्मान महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रदान केले जातात.

निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ व्हावी या उद्देशाने कृषी विभागाने स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले प्रस्ताव कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) असलेल्या ‘Agri Award’ टॅबद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत असून, विहित नमुन्यातील अटी व शर्तींचे पालन करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


--

Post a Comment

0 Comments