जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे
जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन
अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जन्म किंवा मृत्यूची घटना घडल्यापासून 21 दिवसांच्या आत त्याची अधिकृत नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. विहित मुदतीत नोंदणी न केल्यास भविष्यात अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी नागरिकांना ही प्रक्रिया गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे.
शासन निर्णय आणि जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 नुसार, 21 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी केल्यास प्रमाणपत्र मोफत मिळते. यामुळे नागरिकांना विनाकारण विलंब शुल्क किंवा दंडाचा भुर्दंड सोसावा लागणार नाही. जन्म नोंदणी ही शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र काढण्यासाठी आणि शासकीय योजना, शिष्यवृत्ती व वयाचा अधिकृत पुरावा म्हणून आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, मृत्यू नोंदणी ही वारसाहक्क निश्चित करणे, मालमत्तेचे हस्तांतरण, पेन्शन, विमा दावे आणि बँक खाती बंद किंवा हस्तांतरित करण्यासाठी तसेच शासकीय नोंदी अद्ययावत ठेवण्यासाठी आवश्यक असते.
अनेकदा नागरिकांच्या दुर्लक्षामुळे नोंदणी करण्यास उशीर होतो, अशा वेळी अतिरिक्त दंड भरण्यासोबतच पोलीस चौकशी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागतो. ही कटकट टाळण्यासाठी जन्म किंवा मृत्यूची घटना घडताच संबंधित नगरपरिषद, ग्रामपंचायत, शासकीय रुग्णालय किंवा अधिकृत नोंदणी केंद्रात तातडीने संपर्क साधावा. नागरिकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून आणि स्वतःच्या सोयीसाठी जन्म-मृत्यूची नोंद वेळेतच करावी, जेणेकरून भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळता येतील, असे आवाहन डॉ. पारिसे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments