अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : समाज कल्याण विभागातर्फे ‘घर घर संविधान’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने बुधवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या महर्षी रमण सभागृहात अभियानाचे उद्घाटन, तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, तहसीलदार विजय लोखंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, व्याख्याते प्रा. डॉ. राजेश मिरगे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय प्राचार्य डॉ. विनय राऊत, माजी प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संगीता भुयार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, समाज कल्याण अधिकारी एस. एस. बोबडे, विशेष अधिकारी सचिन मोरे उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी श्री. भटकर यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस फक्त एका पुस्तकाचा स्विकारण्याचा दिवस नाही. हा दिवस देशाच्या आत्म्याची, विचारांची आणि मूल्यांची पुनःस्थापना करणारा दिवस आहे. भारतीय संविधान म्हणजे केवळ कायद्याचा ग्रंथ नव्हे, तर लाखो वंचिताच्या आशेचा दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाचे निर्माता हे डॉ. आंबेडकर असल्याचे सांगितले.
प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी भारतीय संविधानकर्त्यांना देशातील पारंपारिक विषमता मुलक मानसिकतेचे चांगलेच ज्ञान व भान होते. म्हणूनच त्यांनी संविधानामध्ये मूलभूत हक्काची तरतूद केली असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. राजेश मिरगे यांनी संविधान दिन हा केवळ घटनादिनाचा स्मरण दिन नाही. लोकशाहीचे आत्मपरीक्षण आणि वचनबद्ध होण्याचा दिवस असल्याचे सांगितले.
सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. जनजागृती अभियानाच्या संविधान चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले. समाज कल्याण अधकिारी सरिता बोबडे यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments