अफवांना बळी न पडण्याचे आवाहन
अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी अलीकडील काही दिवसांपासून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून नकारात्मक व निराधार अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु आहे.
महामंडळामार्फत जुलै ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत मोठ्या संख्येने कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. दि. 10 ऑक्टोबर 2025 पासून महामंडळाच्या वेब प्रणालीचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, वेब प्रणालीचे सुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत, कर्ज व बँक मंजुरी या दोन सेवा 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात देण्यासाठी आवश्यक ते बदल करणे सुरु आहे. मध्यस्थांमार्फत लाभार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी, महामंडळाने सीएसआर केंद्राद्वारे फक्त 10 रुपयांत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सामंजस्य करार केला आहे, त्यास अनुषंगाने वेब प्रणालीमध्ये बदल करण्याचे काम सुरु आहे. लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईलद्वारे देता याव्यात म्हणून मोबाईल ॲप विकसित होत आहे.
महामंडळामार्फत लाभार्थ्यांना सुरळीत व सहजपणे व्याज परतावा मिळणार आहे. लाभार्थ्यांना योजनांबाबत मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी चॅटजीपीटी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महामंडळ समाजाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहे, तरी सर्वसामान्य नागरिकांना आणि लाभार्थ्यांना विनंती आहे की, कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवांवर आधारित माहितीवर विश्वास ठेवू नये. महामंडळाचे सर्व कामकाज सुरु असून, वेब प्रणालीचे अद्ययावतीकरण हे समाजहिताचे व लाभार्थ्यांच्या सोयीसाठीचे आहे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक रोहित मोंढे यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments