अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि नाफेड यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम 2025-26 मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीनची प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत असून, खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाने या पिकांसाठी आधारभूत दर निश्चित केले आहेत. त्यानुसार, मूग 8 हजार 768 रुपये, उडीद 7 हजार 800 रुपये आणि सोयाबीन 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केले आहेत.
खरेदी प्रक्रियेसाठी राज्य शासनाने दोन केंद्रीय नोडल एजंन्सींची नियुक्ती केली आहे. यामध्ये नाफेडकडे (Nafed) अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिमसह एकूण 22 जिल्ह्यांची जबाबदारी असेल, तर एनसीसीएफकडे (NCCF) नागपूर, चंद्रपूर, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, हिंगोली या एकूण 6 जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावाजवळील नाफेड,किंवा एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने पॉस मशीनद्वारे करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, चालू वर्षाचा 7/12 उतारा आणि पीकपेरा या कागदपत्रांसह शेतकऱ्यांची केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. नोंदणीनंतर एसएमएस प्राप्त झाल्यावरच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर घेऊन यावा, असे आवाहन पणन महासंघाच्या संचालक मंडळाने केले आहे.
Post a Comment
0 Comments