अमरावती, दि. 11 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आयोजित केलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५’ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तथापि, ३,९८७ उमेदवारांनी अद्यापही बी.एड. व डी. एल. एड परीक्षेबाबत आवश्यक माहिती सादर न केल्याने त्यांचा निकाल राखीव ठेवला आहे. या उमेदवारांनी 15 सप्टेंबर २०२५ पर्यंत www.mscepune.in या संकेतस्थळावरील लिंकद्वारे आपली माहिती व अंतिम वर्षाच्या उत्तीर्णतेचा निकाल सादर करणे अनिवार्य आहे. या तारखेनंतर सादर केलेल्या माहितीचा विचार केला जाणार नाही, असे परिषदेने स्पष्ट केले आहे. सर्व उमेदवारांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयबीपीएस या संस्थेमार्फत २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत राज्यात ६० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१९,३०८ उमेदवार परीक्षेला बसले होते. या अनुषंगाने परीक्षेचा निकाल दि. 25 ऑगस्ट व 3 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला असून निकाल गुणयादी (Score List) व गुणपत्रक (Score Card) स्वरूपात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
तथापि, ज्या बी.एड. आणि डी.एल.एड. उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी परीक्षा परिषदेने एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. एकूण ६,३२० प्रविष्ट उमेदवारांपैकी २,७८९ जणांचा निकाल २५ ऑगस्ट रोजी जाहीर झाला, तर ३४४ जणांचा निकाल ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, ३,९८७ उमेदवारांनी अद्यापही आवश्यक माहिती सादर न केल्याने त्यांचा निकाल राखीव आहे. या उमेदवारांनी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत www.mscepune.in या संकेतस्थळावरील लिंकद्वारे आपली माहिती व अंतिम वर्षाच्या उत्तीर्णतेचा निकाल सादर करणे अनिवार्य आहे. या तारखेनंतर सादर केलेल्या माहितीचा विचार केला जाणार नाही, असे परिषदेने स्पष्ट केले आहे. सर्व उमेदवारांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही परिषदेव्दारे कळविण्यात आले आहे.
00000
Post a Comment
0 Comments