अमरावती, दि. 26 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): महिला व बालकांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पौष्टिक आहाराच्या सेवांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पुरस्कृत केलेले 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियान अमरावती येथे सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले हे अभियान राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील सर्व सेवा दवाखान्यांमध्ये 17 सप्टेंबर, 2025 पासून राबवले जात आहे.
या अभियानामध्ये महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, सिकल सेल आणि क्षयरोग यांसारख्या आजारांची तपासणी केली जात आहे. याशिवाय, स्तन कर्करोग, गरोदर मातांची तपासणी, महिला व बालकांसाठी संतुलित आहार, मासिक पाळीतील स्वच्छता, डोळे आणि दातांची काळजी यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे.
या अभियानाचा लाभ सर्व विमाधारकांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. उज्ज्वला माळवे आणि प्रशासन अधिकारी डॉ. राजनारायण गोमासे यांनी केले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनीत कावरे, परिचारिका स्नेहा बारसाराडे, पियुष कनेरी आणि दवाखान्यांमधील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमामुळे महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
Post a Comment
0 Comments