*’जागर महिला आरोग्याचा’ उपक्रमाला सुरवात
अमरावती, दि. 24 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : महिलांमध्ये कर्करोगाबद्दल असंख्य गैरसमज पसरले आहेत. मात्र कर्करोगाचे निदान अगदी सुरवातीच्या टप्प्यात झाल्यास हा रोग पूर्णपणे बरा होणारा आहे. त्यामुळे महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून कर्करोगाला वेळीच आळा घालावा, असे आवाहन कर्करोग तज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के यांनी केले.
पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशानातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याबाबत दि. 30 सप्टेंबरपर्यंत जिल्हा नियोजन भवन येथे मार्गदर्शन आणि तपासणी शिबिर घेण्यात येत आहे.
कर्करोग तज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के यांनी कर्करोगाची तपासणी आणि उपचार यावर मार्गदर्शन केले. डॉ. सोनटक्के म्हणाल्या, स्त्रिया बरेचदा कामाला जास्त प्राधान्य देऊन प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. यामुळे शारीरिक व मानसिक तणाव वाढून दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात. यासाठी स्त्रियांनी आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावे. नियमित आवश्यक आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात. भारतामध्ये कर्करोगाच्या रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या खाण्याच्या पद्धती बदलवून उत्तम आरोग्यशैली पूर्ण जीवन जगण्यासाठी स्वतःहून लक्ष केंद्रित करावे. घरातील महिलेची प्रकृती उत्तम राहिल्यास ती परिवारातील अन्य सदस्यांची काळजी चांगल्या प्रकारे घेवू शकते. यासाठी महिलांनी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.
जीवनशैलीतील बदलामुळे शहरी आणि ग्रामीण भागात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. वेळीच निदान आणि उपचारामुळे हा आजार बरा होणे शक्य आहे. स्तनाचे कर्करोगाची तपासणी स्त्रियांनी दर महिन्याला घरीच करावी. काही लक्षणे आढळल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. श्वेत प्रदर रोगावरील उपचार व काळजी, मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, सकस आहाराचे महत्त्व, व्यायाम याबाबात डॉ. भावना सोनटक्के यांनी सखोल माहिती दिली. तसेच उपस्थित महिलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
00000
Post a Comment
0 Comments