जिल्ह्यातील 7 हजाराच्यावर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींचा सहभाग
अमरावती, दि. 25 ( ग्रामीण उदय प्रतिनिधी): केंद्र पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) नुकतीच जिल्ह्यामध्ये उत्साहात पार पडली. या परीक्षेत जिल्ह्यातील 7,784 नोंदणीकृत असाक्षरांपैकी 7,338 व्यक्तींनी सहभाग घेतला.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, 2022-23 ते 2026-27 या कालावधीत असाक्षरांना साक्षर करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जात आहे. ही चाचणी मराठी, उर्दू, आणि हिंदी माध्यमांतून युडायस प्राप्त शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रक एकत्रित देण्यात येईल. ही चाचणी केवळ साक्षरता तपासणारी नसून, त्यातून व्यक्तींच्या जीवनात आर्थिक, कायदेविषयक, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांसारख्या जीवनकौशल्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे.
परीक्षेचे कामकाज यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), प्राचार्य (डायट), गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच, सर्व शिक्षक संघटना, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी परीक्षा नियोजन केले. शिक्षणाधिकारी (योजना) तथा नवभारत साक्षरता कार्यक्रम सदस्य सचिव निखिल मानकर यांनी सर्व परीक्षार्थींचे अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments