अमरावती, दि. 25 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : चिखलदरा येथे आठवा राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्ताने पोषणदिंडी उत्स्फूर्तपणे काढण्यात आली.
महिला व बाल विकास विभाग, चिखलदरा तसेच आरोग्य विभाग व पंचायत समितीच्या वतीने पोषण माहच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात प्रामुख्याने किशोरी मुलींना संतुलित आहार व आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोषण अभियान अंतर्गत किशोरी मुलींची आरोग्य तपासणी आणि 100 किशोरी मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण करण्यात आले.
बालविवाह निर्मूलनाबाबत व्याख्यान आणि जनजागृतीपर पोषण दिंडी काढण्यात आली. पोषण माहमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या अनुषंगाने स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बालविवाहाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. कमी वयात केलेल विवाहामुळे सामाजिक समस्येसोबतच महिलांमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले. महिलांनी पोषण आहारावर लक्ष केंद्रीत केल्यास कुटुंबातील वातावरणही चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी महिलांच्या पोषण आहाराबाबत माहिती दिली. महिलेचे चांगले पोषण झाल्यास चांगली पिढी घडू शकते. तसेच कमी वयातील विवाह टाळण्यासाठी समाजाने जागरूक राहून कार्य करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ शुक्ला, सहायक जिल्हा अधिकारी कौशल्या एम. महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी विलास मरसाळे, तहसिलदार जीवन मोरानकर, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, पर्यवेक्षका व अंगणवाडी सेविका, एकात्मिक बाल विकास योजनाचे कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments