*’जागर महिला आरोग्याचा’ मध्ये कायदेतज्ज्ञ डॉ. वर्षा देशमुख व डॉ. अनिरुद्ध पाटील यांचे मार्गदर्शन
अमरावती, दि. 25 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशानातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन आणि तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. आज या शिबिरामध्ये महिलांना कायदेविषयक बाबींबाबत माहिती देण्यात आली. 'महिला आणि कायदा ' या विषयावर कायदेतज्ज्ञ डॉ. वर्षा देशमुख यांनी तर 'महिला सबलीकरण' या विषयावर डॉ.अनिरुद्ध पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा खणिकर्म अधिकारी प्रणिता चाफले, नायब तहसीलदार स्नेहल देशमुख, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन सभागृहात जागर महिला आरोग्याचा उपक्रमामध्ये राबविण्यात येत आहे. यात कायदेविषयक मार्गदर्शन करतांना डॉ . वर्षा देशमुख म्हणाल्या, स्त्रियांचे सक्षमीकरण म्हणजे नुसता हक्क नसून कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. बरेचदा स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या असून देखील घरातील निर्णय पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरुष घेतात. यामुळे उच्चशिक्षित स्त्री ही सक्षम झाली आहे, असे म्हणता येणार नाही. तिला घरातील महत्त्वपूर्ण बाबींचा निर्णय घेण्याचा हक्क असणे गरजेचे आहे. तेव्हा स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम होईल. स्त्रियांच्या संरक्षणासाठी शासनाने सर्व आवश्यक कायदे केलेले आहेत. परंतु या कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी स्त्रियांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला अन्य मुलीचा आदर करायला शिकवायला हवे. हे बाळकडू मुलांना घरातून मिळायला हवे, तेव्हाच सशक्त समाज तयार होईल.
कार्यालयीन कामकाज करताना काही तक्रार असल्यास विशाखा समितीचा वापर करावा. कोणत्याही अन्यायविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कायदे आहे. महिलांनी कायद्याबाबत साक्षरता बाळगावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ.अनिरुद्ध पाटील म्हणाले, स्त्री पुरुष समानता ही केवळ कागदोपत्री नसावी. आज स्त्री तिच्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. स्त्रियांना संधी उपलब्ध करून दिल्यास त्या नक्कीच यशस्वी होतात. मुलांप्रमाणे मुलींनाही प्रगतीसाठी वेळ द्यायला हवा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. स्त्री हक्क अबाधित राहावा यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असतात. याबाबत समाजात सातत्याने जागृती निर्माण केल्या जाते. परंतु त्या कायद्याचा गैरवापर होणार नाही यासाठी प्रत्येक व्यक्तीने नैतिकता बाळगावी. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी स्त्रियांनी स्वतः पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन चैताली यादव यांनी तर आभार श्रीमती गांवडे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments