Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

"अमरावती जिल्हा: खरिपाच्या पीककर्ज वितरणाला सुरुवात; १६५० कोटींच्या लक्ष्यापैकी ४६% वाटप पूर्ण"


दि. २०  अमरावती :-

अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाची गडबड सुरू झाली असून, बँकांमध्ये पीककर्जासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे . यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १६५० कोटी रुपयांच्या पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे . त्यापैकी आतापर्यंत ४६ टक्के म्हणजेच ७५७.१२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे .

जिल्ह्यातील पीककर्जाचे नियोजन आणि सद्यस्थिती
एकूण उद्दिष्ट (लक्ष्यांक): १६५० कोटी रुपये 
एकूण लाभार्थी शेतकरी: १,८८,६०० शेतकरी 
प्रत्यक्ष कर्ज मिळालेले शेतकरी: ५२,५०३ शेतकरी
वितरित कर्ज रक्कम: ७५७.१२ कोटी रुपये (एकूण ४६ टक्के प्रगती)
राष्ट्रीय व खाजगी बँकांची संथ गती; पालकमंत्री नाराज
जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ६०० शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट असले, तरी राष्ट्रीय आणि खाजगी बँकांनी कर्ज वितरणात हात आखडता घेतल्याचे चित्र आहे . ग्रामीण व राष्ट्रीय बँकांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याने खरीप पूर्वतयारी आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली  कर्ज वितरणात टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत .
बँकनिहाय कर्ज वितरण स्थिती (कोटी रुपयांमध्ये)
जिल्हा मध्यवर्ती बँक: लक्ष ७८०.०० कोटी | वितरण ५९५.५६ कोटी (७६ टक्के - सर्वोत्तम कामगिरी) .
राष्ट्रीय बँका: लक्ष ७५२.७५ कोटी | वितरण १५०.०१ कोटी (२० टक्के) 
ग्रामीण बँक: लक्ष २२.०० कोटी | वितरण ३.९१ कोटी (१८ टक्के) .
खाजगी बँका: लक्ष ९५.०० कोटी | वितरण ७.६४ कोटी (८ टक्के - सर्वात कमी कामगिरी)
बँकांवर कारवाईचे नुसतेच इशारे?
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांमधील शासकीय खाती बंद करणे, तसेच बँकांच्या कार्यालयांवरील पाणी व वीजपुरवठा तोडण्याबाबतचे इशारे प्रशासनाकडून देण्यात आले होते . मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही बँकेवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही  त्यामुळे बँकांचा मनमानी कारभार सुरूच असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत असून, यंदा पालकमंत्री कडक पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे 

Post a Comment

0 Comments