अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटरच्या वतीने आज, 19 मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात सकाळी 10 वाजता घेण्यात आला. मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखतींमधून 52 नोकरी इच्छुक उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
उद्घाटक म्हणून कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे उपस्थित होते. सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रमुख उद्योजक म्हणून जाधव गियर्सचे प्रतिनिधी रोहित प्रांजळे, जिनस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली. चे प्रतिक इंगोले, प्रेसिजन मेपिंगचे सचिन निचले, टॅलेन्टकॉर्प सोल्यूशन प्रा. ली. नागपूरच्या करिष्मा पासवान आणि शिखर एज्युकेअर अमरावतीचे आयुष अग्रवाल उपस्थित होते.
उपायुक्त श्री. ठाकरे यांनी युवकांनी केवळ रोजगार मिळविणारे न होता, स्वतःचे उद्योग सुरू करून रोजगार देणारे उद्योजक व्हावे, असे आवाहन केले. सहायक आयुक्त श्रीमती बारस्कर यांनी प्रास्ताविकातून प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचे महत्त्व पटवून दिले. ही योजना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये प्रवेश मिळविण्याची सुवर्णसंधी आणि एक उत्तम मार्ग असल्याचे सांगितले.
मेळाव्यासाठी ऑनलाइन, ऑफलाइन माध्यमातून 164 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 124 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर मुलाखती दिल्या. सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांची योग्यता तपासून 52 उमेदवारांची प्राथमिक निवड केली. सोनाली भोगे यांनी सूत्रसंचालन केले, पंकज कचरे यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments