Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

चांदूर बाजार येथे 'दामिनी पथक' व 'पोलीस मित्र' कार्यान्वित करण्याची मागणी;





 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणेदारांना निवेदन
दि. २३ चांदूर बाजार (अमरावती):
शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर चांदूर बाजार येथे तातडीने 'दामिनी पथक' आणि 'पोलीस मित्र' गट कार्यान्वित करण्यात यावा, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने केली आहे. यासंदर्भात संघाच्या वतीने चांदूर बाजार पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ही संतांची आणि शौर्याची परंपरा लाभलेली भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान राखण्याचा आदर्श जगासमोर ठेवला आहे. मात्र, अलीकडच्या काळात राज्यात घडणाऱ्या काही दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांमुळे सर्वसामान्य महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शासकीय निर्देशांची अंमलबजावणी करण्याची मागणी
शासनाने प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत महिलांच्या सुरक्षेसाठी 'दामिनी पथक' नेमण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन करून चांदूर बाजार परिसरातही हे पथक तत्काळ तैनात करावे. तसेच, पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'पोलीस मित्र' ही संकल्पना पुन्हा प्रभावीपणे राबवण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
गांभीर्याने दखल घेण्याची विनंती
हे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष डॉ. राहुल पुरनमल अहिर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पावले उचलावीत, अन्यथा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक जटिल होऊ शकतो, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments