अमरावती, दि. 07 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना योजनेच्या अर्जात दुरुस्तीसाठी संधी देण्यात आली आहे. ज्या पात्र महिलांनी अर्ज भरताना कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी किंवा निवृत्तीवेतनाबाबत नजरचुकीने चुकीची माहिती निवडली होती, त्यांना आता ही चूक सुधारण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
योजनेच्या निकषानुसार, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी (नियमित किंवा कंत्राटी) नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेणारा नसावा, अशी अट आहे. मात्र, 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक लाभार्थ्यांकडून या पर्यायाबाबत चुकीची नोंद झाली होती. अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाइन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ज्या पात्र महिलांच्या अर्जामध्ये अशा तांत्रिक त्रुटी आहेत, त्यांनी विहित मुदतीत म्हणजे 30 एप्रिल 2026 पर्यंत आपली माहिती ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अपडेट करावी. या दुरुस्तीमुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात येणारे अडथळे दूर होणार असून, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
Post a Comment
0 Comments