अमरावती, दि. ०९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यासाठी विमा एजंट नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी 18 वर्षांपेक्षा कमी नसावे तसेच उमेदवार किमान इयत्ता दहावी किंवा बोर्डाची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ही त्यांचे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञान आणि मुलाखतीत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून एनएससी किंवा केव्हीपीच्या स्वरूपात ठेवावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून सुरुवातीला तात्पुरता परवाना देण्यात येईल. हा परवाना आयआरडीए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी परवान्यात रूपांतरित केला जाईल. ही परीक्षा नियुक्तीनंतर 3 वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. भारतीय डाक विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता निवड रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.
इच्छुक उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोसह दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 'प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती - 444602' येथे उपस्थित राहावे, असे आवाहन अमरावती विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Post a Comment
0 Comments