*कृषी विभागाची कारवाई
अमरावती, दि. ३०(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी केंद्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यात गंभीर त्रुटी आढळल्याने 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर 6 केंद्रांना कडक ताकीद देण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांची तपासणी केली. या तपासणीत ई-पॉस मशीनवरील नोंद आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळणे, खतांची छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे किंवा पक्के बिल न देणे, परवाना नसताना बियाण्यांची साठवणूक करणे किंवा नोंदवही अद्ययावत नसणे, अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक आणि विक्री करणे आदी बाबी तपासून कारवाई करण्यात आली आहे.
कृषी विभागाने एप्रिल 2026 अखेरपर्यंत 100 टक्के विक्री केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. फसवणूक टाळण्यासाठी बियाणे किंवा खते केवळ अधिकृत परवानाधारक केंद्रांकडूनच खरेदी करावीत, खरेदी केल्यानंतर पक्के बिल आवर्जून घ्यावे आणि बियाण्यांच्या पाकिटाचे सील तपासावे, खते खरेदी करताना दुकानदार अनावश्यक उत्पादने (लिंकिंग) घेण्याची सक्ती करत असल्यास तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
शेतकऱ्याची फसवणूक झाली किंवा खतांचा अवाजवी दर आकारला गेल्यास, त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांकडे संपर्क साधावा. तक्रारीसाठी कृषी विभागाने ८०८०५३६६०२ हा व्हॉट्सअॅप क्रमांक देखील जाहीर केला आहे.
Post a Comment
0 Comments