541 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
अमरावती, दि. ८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अमरावती तालुक्यातील वलगाव मंडळात काल 7 मार्च रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' उत्साहात पार पडले. सिकची रिसॉर्ट येथे आयोजित या शिबिरामध्ये शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या शिबिराचे आयोजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार राजेश वानखेडे, रवी राणा, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख शासन निर्णयांचे वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महसूल मंत्र्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या शिबिरात एकूण 541 लाभार्थ्यांना विविध विभागांतर्गत प्रमाणपत्रे, धनादेश, सात बारा उतारा आणि फेरफार पत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच शिबिरात 64 नागरिकांना ई-शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. रेवसा येथील पूरग्रस्तांना पुनर्वसन भूखंडांचे 227 सात बारा उतारे देण्यात आले. तसेच 68 विधवा आणि अपंग लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजनेची प्रमाणपत्रे देण्यात आली. 61 नागरिकांना अधिवास प्रमाणपत्रे (Domain Certificate) प्रदान करण्यात आली. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. तसेच लेक लाडकी योजना, आयुष्मान गोल्डन कार्ड आणि पी.आर. कार्डचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले. आभार प्रदर्शन तहसीलदार विजय लोखंडे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments