जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदणीकृत जिवंत (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी रेणुका बिहार, खसरा क्र. 29, एम. झेड. ढाबा, नांदगाव खंडेश्वर रोड, जि. अमरावती येथे सुरू करण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांमधील कामगारांना या ठिकाणी येऊन गृहपयोगी संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संच घेऊन जाणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे नाही. वाटपाच्या ठिकाणी दररोज सुमारे 3 हजार कामगारांना संच वाटपासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी व गोंधळ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी सक्रीय बांधकाम कामगारांना वितरीत करण्याच्या गृहपयोगी वस्तू, सुरक्षा व अत्यावश्यक संचाच्या वाटप तात्काळ बंद करण्यात येत आहे. याबाबत सर्व कामगारांना आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केल आहे.
तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस विभाग यांच्याशी समन्वय साधून योग्य ते नियोजन करुन साहित्य वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात येईल. भविष्यात तालुका स्तरावर एका दिवशी जास्तीत जास्त 500 बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्यात यावे, तसेच कोणतेही वाटप सुरू करण्यापूर्वी या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य राहील.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 चे कलम 56 नुसार बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करतांना कोणतीही जिवीत व वित्त हानी होणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. याबाबत कोणतीही कुचराई आढळून आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी हे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 चे कलम 56 नुसार कार्यवाहीस पात्र राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केल आहे.
Post a Comment
0 Comments