'स्मार्ट टेक, सुरक्षित पर्याय' या संकल्पनेवर भर
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम
अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : आजच्या वेगवान डिजिटल युगात इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरक्षितरीत्या व्हावा, या उद्देशाने 'सुरक्षित इंटरनेट दिन' जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी हा दिवस “स्मार्ट टेक, सुरक्षित पर्याय - आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरक्षित आणि जबाबदार वापर” या संकल्पनेवर आधारित होता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनातील जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी मनीष कुमार आणि गाडगेनगर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ताहीर अली सय्यद यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, पासवर्डची सुरक्षितता आणि ओटीपी शेअर न करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली.
यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, डिजिटल हायजीनमध्ये डिजिटल अकाउंट्स आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या पद्धती, सोशल मीडियाचा वापर करीत असताना शासकीय काम आणि वैयक्तिक जीवनात सोशल मीडियाचा जबाबदार वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोविंद धनेज, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'इंटरनेट आणि एआयच्या सुरक्षित वापरा'ची सामूहिक शपथ घेतली. तसेच, कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी एका विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.
Post a Comment
0 Comments