मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन
दि. ४ अमरावती : अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर अमरावतीचे बेलोरा विमानतळ लोकार्पित झाले आहे. या विमानतळाच्या उभारणीसाठी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सकारात्मक सहभाग लाभला होता. अमरावती जिल्ह्यातील जनता त्यांचे हे ऋण कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे अमरावती विमानतळास स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी अमरावती अखबारचे संपादक ऋषिकेश शर्मा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापु तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.
पाठविण्यात आलेल्या निवेदनात ऋषिकेश शर्मा यांनी नमूद केले आहे की, अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी स्व. अजितदादा पवार स्वतः उपस्थित होते. त्यांच्या कार्यकाळात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी राज्याच्या विकासासाठी, पायाभूत सुविधांसाठी तसेच जनहिताशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये मोलाची भूमिका बजावली.
प्रेस नोटमध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की, स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी व दूरदृष्टीचे नेतृत्व गमावले आहे. अमरावती व पश्चिम विदर्भातील जनतेच्या मनात त्यांच्या विषयी विशेष आदर व कृतज्ञतेची भावना आहे. अशा परिस्थितीत अमरावती विमानतळास “अजितदादा पवार विमानतळ” असे नाव देणे हा त्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान ठरेल.
ऋषिकेश शर्मा यांनी मुख्यमंत्री व संबंधित केंद्रीय मंत्र्यांना जनभावनांचा आदर करून अमरावती विमानतळाच्या नामकरणासंदर्भातील मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.
Post a Comment
0 Comments