अमरावती दिनांक १६ (सौ. विद्या दाभाडे) (ग्रामीणमध्ये न्यूज नेटवर्क)
फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा कार्यकाळ संपणार आहे. तेव्हा ग्रामपंचायत मध्ये विद्यमान सरपंचांना प्रशासक न नेमता त्या- त्या गावातील पत्रकारांची नेमणूक करण्यात यावी असे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पाठविले आहे.
२०२६ होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता कुठलाही कार्यक्रम प्रशासनाने अध्याप जाहीर केलेला नाही. विद्यमान सरपंचांना प्रशासक नियुक्त केल्यास पुढील होणारी निवडणूक प्रभावी होऊ शकते याकरीता पत्रकारितेत १५ वर्ष अनुभव असलेल्या पत्रकारांची नेमणूक केल्यास थोडे दिवस का होईना ग्रामपंचायत च्या विकासाला हातभार लागणार आहे. प्रत्येक वेळेस राजकीय पक्ष पत्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे या मागणीची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी दखल घ्यावी. अशी मागणी केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने,. केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान पठाण, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, सुरेश सवळे अध्यक्ष नियोजन समिती, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना इमेल ने पाठवलेल्या निवेदनात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने नमूद केले आहे.
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा जिथे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत, अशा ठिकाणी प्रशासक म्हणून अनुभवी पत्रकारांची नेमणूक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने राज्य सरकारकडे केली आहे.
मागणीचे स्वरूप: ग्रामीण भागातील समस्यांची जाण पत्रकारांना सर्वात जास्त असते. गावातील विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय त्रुटी यांवर पत्रकार सतत लक्ष ठेवून असतात. त्यामुळे त्यांना प्रशासक म्हणून संधी दिल्यास गावाचा विकास अधिक पारदर्शक पद्धतीने होईल, असा दावा संघाने केला आहे.
प्रशासकीय पारदर्शकता: अनेकदा शासकीय अधिकारी किंवा राजकीय व्यक्तींची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यावर कामात दिरंगाई किंवा राजकीय हस्तक्षेप होतो. मात्र, पत्रकारांची नियुक्ती केल्यास भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि सामान्य जनतेची कामे वेळेत होतील, असे निवेदनात म्हटले आहे.
संघटनेची भूमिका: ग्रामीण भागातील पत्रकारांना सन्मान मिळावा आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व्हावा, हा यामागचा उद्देश असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांच्या रणधुमाळीत ग्रामीण भागातील या मागणीने आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Post a Comment
0 Comments