केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी
अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): बालविवाहासारखी सामाजिक कुप्रथा मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 'बालविवाह मुक्त भारत' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून अमरावती जिल्हा प्रशासनाने 'बालविवाह मुक्त अमरावती जिल्हा अभियान' हाती घेतले असून, याअंतर्गत प्रत्येक नागरिकाने ऑनलाइन शपथ घेऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या नागरिकांना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र मिळणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून नागरिकांनी खालील पायऱ्यांचे अनुसरण करून आपले प्रमाणपत्र मिळवावे.
गुगलवर जाऊन stopchildmarriage.wcd.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा. 'Login' वर क्लिक करून 'Take Pledge' (टेक प्लेज) हा पर्याय निवडावा. आपली वैयक्तिक माहिती भरून सबमिट केल्यावर बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा पडद्यावर दिसेल. 'मी प्रतिज्ञा घेतली' या बटणावर क्लिक करताच आपले डिजिटल प्रमाणपत्र डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.
बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण थांबते आणि त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. समाजातील प्रत्येक घटकाने या अनिष्ट प्रथेविरोधात एकत्र येणे गरजेचे आहे. ‘तुमची एक शपथ म्हणजे एका मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे,’ अशा शब्दांत प्रशासनाने या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने या मोहिमेचा प्रचार ग्रामीण भागापर्यंत केला जात असून, अमरावती जिल्ह्याला बालविवाह मुक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या ऑनलाइन शपथ अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments