अमरावती, दि. १३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयाच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी १९ डिसेंबरपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११वी, १२वी तसेच १२वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरू केली आहे. सन २०२३-२४ व २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रांतील कमतरतेमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण न केल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी, विद्यार्थ्यांची राहील. याबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाशी किंवा दुरध्वनी क्र. ०७२१-२६६१२६१ वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण, सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments