अमरावती, दि. ४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येते, रब्बी हंगाम पिक स्पर्धा 2025 मध्ये शेतकऱ्यांना सहभागीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.
पिक स्पर्धेमध्ये रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पाच पिकांचा समावेश आहे. पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. राज्यस्तरावर पिकस्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येणार आहे. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस रु. 5 हजार, दुसरे बक्षिस 3 हजार व तिसरे बक्षिस 2 हजार रूपये आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे बक्षिस 7 हजार व तिसरे बक्षिस 5 हजार रूपये स्वरुप आहे. राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे बक्षिस 40 हजार व तिसरे बक्षिस 30 हजार रूपये आहे.
स्पर्धेसाठी सर्वसाधारण आणि आदिवासी गट राहणार आहे. प्रवेश शुल्क हे पिकनिहाय 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रूपये राहणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी krush.maharashtra.gov.in किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments