जिल्ह्यात अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण संपन्न
अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सन 2022 पासून पाणी फाउंडेशनने "सत्यमेव जयते फार्मर कप" या उपक्रमाद्वारे संघटन आणि ज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य सुरू केले आहे. या उपक्रमाचा परिणाम 50 हजारहून अधिक शेतकऱ्यांवर झाला असून त्यातील निम्म्या संस्था महिला शेतकऱ्यांच्या आहेत, त्यामुळे हे व्यासपीठ महिला सशक्तीकरणासाठीही प्रभावी ठरले आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि गावात याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतीतील संघटनेसाठी जनचळवळ उभी राहील आणि ग्रामीण समृद्धी साधता येईल. पाणी फाउंडेशन या उपक्रमाद्वारे केवळ जलसंधारणच नव्हे, तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प बळकट करत आहे. त्याअनुषंगाने, पाणी फाउंडेशन मार्फत घेण्यात येत असलेल्या 'फार्मर कप'साठी शेतकरी तसेच अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे कृषी चिकित्सालय, येरला, मोर्शी येथे मोर्शी व तिवसा तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली पाणी फाउंडेशन यांच्या समन्वयाने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय सभागृह, अमरावती येथे अमरावती व भातकुली, तसेच दि. 3 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय सभागृह, नांदगाव खंडेश्वर येथे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पाणी फाउंडेशन यांच्या समन्वयाने एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी 'फार्मर कप' उपक्रमाचे उद्दिष्ट, शाश्वत जलव्यवस्थापनाचे महत्त्व, गट शेती, पाणी बचत आणि शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी गट बांधणी या विषयावर मार्गदर्शन केले.
Post a Comment
0 Comments